पहाटे चार वाजता ऊठून तरुने मला काय सांगावं?
’पप्पा आजोबा ,आपल्या नव्या नाटकाचं नाव काय ठेवायचं
माहिती आहे?"
"काय?"
"सिंहाच्या गोष्टीची गोष्ट"
"हं?"
"आपलं नाटक आहे ना ‘माणसाच्या गोष्टीची गोष्ट’, तसं."
गेले कित्येक दिवस तरुच्या या नव्या नाटकाची रोज तालीम सुरू आहे.
ती कुठल्याही वेळी आणि कुठेही सुरू होते.गरज आहे ती फक्त त्याच्या
शिवाय आणखी कुणीतरी कलाकार उपलब्ध असण्याची.
काहीतरी उंच ठिकाण बघून तरू(म्हणजे नाटकातला सिंह!)
‘सिंहासनावर’ बसतो आणि समोरच्याला विचारतो,
"काय प्रश्न आहे तुमचा?"
या प्रश्नाची आम्हाला आता एवढी सवय झालीय आणि इतक्यांदा तो ऐकलाय,
आम्ही सुध्दा तो अवघडात अवघड कसा असेल हेच बघतो.
आणि मग त्या सिंहाचा चेहेरा बघत बसतो.
किती गंभीरपणे विचार करणं सुरू असतं!
केवढा तरी वेळ शांतता असते. एक ताण वातावरणात भरून राहतो.
आणि मग सिंह त्या प्रश्नाचं उत्तर देऊ लागतो.
उदाहरणार्थ-
१.प्रश्न: महाराज,माणसं केवढी झाडं तोडतायत! काय करायचं?
उत्तर: आपण त्यांना सांगायचं,"तोडू नका झाडं."
प्रश्न: कुणीही ऐकत नाही.आपली भाषाच त्यांना कळत नाही.मग?
उत्तर: तुम्ही काळजी करू नका.मी फॉरेस्ट ऑफिसरला सांगेन आता.
२.प्रश्न: महाराज,पाऊस गायब झालाय.प्यायला पाण्याचा थेंब नाही.
उत्तर: हत्तींना बोलावून घ्या.ते लांबून पाणी घेवून येतील.
आणि सोंडेने पाडतील पाऊस!
३.सिंह: हं कोण तुम्ही?
ससा: महाराज मी ससा आहे.
सिंह: हं.काय प्रश्न आहे ससुल्या?
ससा: लपायला जागाच नाही.
सिंह: बीळात राहतोस ना,तिथंच लपायचं
ससा: असं कसं.गवत,गाजर काहीतरी खायला बाहेर
पडायलाच लागणार ना.भीती वाटते खूप.
सिंह: (खूप वेळ कपाळावर अठ्या,भुवया उंचावलेल्या,शांतता..)
घाबरू नको. मी आहे.
तर हे असं ..
रोज रोज नवा प्रयोग!
No comments:
Post a Comment