Sunday, June 26, 2011

सुपारी फुटली..



वस्तुसंग्रहालयातून आणलेलं पुस्तक चाळताना ही गंमत झाली.
एकेका वस्तुचं चित्र बघत बघत, त्या त्या चित्रावर बोलत बोलत
तरु आणि रुपाली यांचा ‘अभ्यास’ चालला होता जणू.
"आई,हे काय आहे?"
"अडकित्ता"
"काय करतात ह्याने?"
"सुपारी फोडतात..कत्रीने कसे कागद कापतो.."
"सुपारी फोडतात? खंडेरायाच्या लग्नाला.."
थोडा वेळ रुपालीच्या लक्षात येईना हा काय म्हणतोय ते.
मग नीटच समजलं तो काय म्हणतोय ते.
सुपारी या शब्दावरनं तो त्या गाण्यात शिरला होता.
‘खंडेरायाच्या लग्नाला,नवरी नटली
नवरी नटली,
अगं बाई सुपारी फुटली.’
कार्तिकी दिदीने म्हटलेलं गाणं त्याच्या लक्षात
होतं तर!
ऐकलेल्या गोष्टी कशा पुन्हा नेमक्या वेळी आठवतात?
प्रत्येक शब्द,सूर,गंध,रुची,स्पर्श,दृश्य यांचं एक गावच वसतं.
सगळे एकमेकांना जोडलेले असतात.वाटा तयार होतात.
नवी घरं तयार होतात.लहानशा वाडीचं शहर होत जातं हळुहळू.
निवांत बसलो असतानाही आपण मनातल्या या ‘स्म्रृतीपुरात’
फिरत असतो. अडकित्त्यातून सुपारीत आणि सुपारीतून लग्नात...

No comments:

Post a Comment